मुंबई बातम्या

मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी नवी यंत्रणा; मुंबई पालिकेकडून ५० कोटी रुपयांच्या खर्चाची तयारी – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईची स्वतंत्र ओळख असलेल्या मिठी नदीतील गाळाची समस्या अद्यापही संपुष्टात आलेली नाही. अनेक वर्षांपासून मिठी नदीतील गाळ चर्चेचा विषय ठरला असून आताही मुंबई पालिकेने त्यात नवीन भर टाकली आहे. त्यातील गाळ काढण्यासाठी आधुनिक पद्धतीचे यंत्रे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई नदीतील गाळसफाईसाठी पालिकेने आतापर्यंत कित्येक कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यात आणखी ५० कोटी रुपये खर्च करून आधुनिक स्तरावरील शिल्ट पुशर अँड टॅक्सॉर यंत्रांची खरेदी केले जाणार आहे. या यंत्राच्या आधारे नदीमधील तरंगत असलेला कचरा आणि पानवेलीची झाडे काढली जातात. परंतु, त्या आधारे नदीतील तळाकडील गाळ काढला जाणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पालिकेकडून या नदीतील गाळ काढण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. तरीही त्यातून समाधानकारक स्तरावर काम न झाल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हा गाळ काढण्यासाठी नवीन यंत्राचा वापर करण्याबाबत विचार सुरू आहे. या यंत्राच्या आधारे नदीच्या काठावर गाळ जमा केला जाणार असून त्यानंतर तो इतर पोकलेनच्या मदतीने उचलावा लागणार आहे.

मिठी नदी स्वच्छतेसाठी आकारले जाणारे दर

पारंपरिक तऱ्हेने नालेसफाई- मेट्रिक टनामागे १,६०९ रु.

सिल्ट पुशिंग पॉनटून यंत्र-मेट्रिक टनामागे २,१९३ रु.

मल्टीपर्पज अॅम्फीबिएस पॉनटून मशिन : मेट्रिक टनामागे २,३६६ रु.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporation-has-decided-to-spent-50-crore-rupees-for-new-system-of-mithi-river/articleshow/80007297.cms