मुंबई बातम्या

मुंबईत तापमानबदलाची शक्यता; अंतर्भागातही घट अपेक्षित – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई, ठाण्यासह कोकण विभागामध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला किमान तापमानात घट जाणवण्याचा अंदाज आहे. तापमानाचा पारा वर-खाली होत असताना शनिवारी पुन्हा सांताक्रूझ येथे किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली गेला. सांताक्रूझ येथे १९.६ तर कुलाबा येथे २२.८ अंश सेल्सिअस तापमानाची शनिवारी सकाळी नोंद झाली. कोकणामध्ये रत्नागिरी, हर्णे येथेही किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आहे. मात्र सोमवारपासून या तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.

राज्यातील किमान तापमान अजूनही सरासरीहून अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अजूनही किमान तापमान सरासरीहून दोन ते चार अंशांनी अधिक आहे. मात्र या तापमानातही दोन दिवस किचिंत घट जाणवेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य प्रदेशामध्ये तापमानाचा पारा खाली घसरला आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान खाली उतरेल. त्यानंतर त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा तापमानामध्ये दोन ते तीन अंशांची वाढ दिसून येणार आहे. मात्र वातावरण कोरडेच असेल. गोंदिया येथे शनिवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार किमान तापमानाचा पारा ८.५ अंशांवर उतरला होता. विदर्भ विभागामध्ये सध्या सरासरीच्या आसपास किंवा सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांचा किमान तापमानामध्ये फरक आहे.

राज्यातील सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असल्याने किमान तापमानामध्ये फारशी घट दिसत नाही. मध्य प्रदेश किंवा वायव्य भारतात गारठा निर्माण झाला तर त्याचा परिणाम राज्यातील लगतच्या जिल्ह्यांवर दिसून येतो. मात्र थंडीच्या आगमनासाठी उत्तरेकडील वारे गरजेचे असतात. किमान आणि कमाल दोन्ही तापमानामध्ये घट होऊन प्रत्यक्ष थंडीची जाणीव होण्यासाठी आणखी एका आठवड्याची प्रतीक्षा करावी लागेल, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

गुजरातमध्ये मात्र काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली उतरला होता. नलिया येथे गुजरात-महाराष्ट्रात क्षेत्रातील सर्वांत कमी म्हणजे ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


वांद्रे-कुर्ला संकुल येथे अतिवाईट हवा

मुंबईच्या गुणवत्तेचा एकूण दर्जा सध्या मध्यम असला तरी वांद्रे-कुर्ला संकुल येथे सातत्याने पीएम २.५ प्रदूषकामुळे हवेची गुणवत्ता अतिवाईट असल्याचे समोर आले आहे. माझगाव, चेंबूर, मालाड येथेही पीएम २.५ मुळे हवेची गुणवत्ता वाईट नोंदली गेली आहे. नवी मुंबई येथेही पीएम २.५ मुळेच हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदली गेली आहे. यासंदर्भात स्थानिक प्रदूषकांबरोबरच वाऱ्यांचा वेग फारसा नसल्याने प्रदूषके हवेत साचून हा परिणाम दिसत असल्याचे ‘सफर’तर्फे स्पष्ट करण्यात आले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-thane-konkan-temperature-will-be-drop-in-starting-of-week/articleshow/79820516.cms