मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणारे एनसीबीचे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर मुंबईतील गोरेगावात हल्ला झाला. यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत. हल्लेखोर नेमके कोण आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही.
एनसीबीकडून गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्यात येत आहे. नुकतीच विनोदी अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली आहे. या दोघांनाही मुंबईतील कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
जवळपास ६० जणांच्या टोळीने केला हल्ला
वानखेडे आणि त्यांच्या पथकावर जवळपास ६० जणांनी हल्ला चढवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यात पथकातील दोन अधिकारी जखमी झाले. एनसीबीचे अधिकारी कॅरी मॅंडिस या ड्रग तस्कराला अटक करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलीस तिथे पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणून पथकातील अधिकाऱ्यांचा हल्लेखोरांपासून बचाव केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.
समीर वानखेडे यांनी भारतीला केली होती अटक
एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे भारती सिंह हिच्या अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घराची झडती घेतली. तिच्या घरातून गांजा हस्तगत करण्यात आला होता. गांजाचे सेवन केल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने भारतीसह पतीलाही अटक केली होती.
अमली पदार्थ प्रकरणात भारती आणि हर्ष यांना दिलासा; जामीन मंजूर
तरुणाचा मारहाणीत मृत्यू; शेजाऱ्याच्या मुलीवर अत्याचार केल्याचा होता आरोप
भाजप महिला मोर्चाच्या नेत्याची ‘अशी’ केली फसवणूक
Source: https://maharashtratimes.com/crime-news/ncb-team-were-attacked-allegedly-by-drug-peddlers-in-goregaon-mumbai/articleshow/79366892.cms