मुंबई बातम्या

पक्षात काही घडतच नाही! मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नैराश्य – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबई प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते व नेत्यांशी मंगळवारी चर्चा केली. अमरजित सिंह मनहास आणि भाई जगताप हे या स्पर्धेत सर्वांत पुढे असून, या दोघांशीही पाटील यांनी चर्चा केल्याचे समजते. काँग्रेसची मुंबईतील सद्यस्थिती पाहता कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

मुंबईमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट असून काही प्रमाणात मुस्लिम जनाधार सोडला तर कोणताही समाज काँग्रेससोबत उरलेला नाही. एमआयएम मुंबई महापालिका निवडणुकीत जोरदारपणे उतरणार हे नक्की आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था अधिकच वाईट होणार असल्याचे काँग्रेसचे नेते खासगीत मान्य करत आहेत. केंद्रीय नेतृत्व कोणतेही निर्णय वेळेवर घेत नाही. वारंवार प्रभारी बदलले गेल्याने त्यांना पक्षातील खाचाखोचा समजून घेण्यास वेळ मिळत नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुंबई महानगर पालिकेत आघाडी करणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील ताकद नक्की वाढणार आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी मुंबईत पक्ष पुनर्बांधणीसाठी तयार होणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुंबई काँग्रेसमधील काही जुने जाणते नेतेही राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयार आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची काहीच तयारी नसून पक्षात केवळ विधान परिषद सदस्यत्व, राज्यसभा सदस्यत्व याची मागणी करण्यासाठीच प्रभारी आले की पुढे पुढे करणाऱ्यांची गर्दी होत असते. महापालिकेत काँग्रेस पक्षाला किमान ३०च्या पुढे जागा मिळवायच्या असल्यास आत्तापासून तयारी करणे आवश्यक आहे. मात्र मुंबई अध्यक्षाचे भिजत घोंगडेच इतके दिवस ठेवले गेले आहे की, आता त्यावर निर्णय घेऊनही येणारा नवा अध्यक्ष फारसा उजेड पाडू शकेल असे वाटत नाही, असे काँग्रेस पक्षातील बहुतांश कार्यकर्त्यांना वाटत आहे.

केंद्रात ज्याप्रमाणे मोदींना कंटाळल्यावर नागरिक आम्हाला मते देतील, असे काँग्रेस नेतृत्वाला वाटते, त्याचप्रमाणे मुंबई काँग्रेसचे पालिका स्थायी समितीत एखादा सदस्य जाईल इतके निवडून आले तरी पुष्कळ झाले, अशी अनेकांची अपेक्षा असल्याने मुंबई काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना नैराश्याने ग्रासल्याचे चित्र आहे.

‘काँग्रेस नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी’

धनगर समाजाचे नेते आणि जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे यांनी पदाधिकारी व आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दादरच्या टिळक भवन येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील उपस्थित होते. धनगर समाजाने नेहमीच काँग्रेसची पाठराखण केली आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटकातही हा समाज मोठ्या संख्येने आहे. काँग्रेसही या समाजाच्या पाठीशी नेहमीच उभा राहिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात सिद्धरामय्या यांना पाच वर्षे मुख्यमंत्रीही करून दाखवले, असे पाटील यावेळी म्हणाले, तर काँग्रेस हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा आणि समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. शेवाळे यांच्या पक्षप्रवेशाने पक्षाला आणखी बळ मिळेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/depression-in-mumbai-congress/articleshow/79267496.cms