मुंबई बातम्या

मुंबई का तुंबली?; शिवसेना म्हणते, पावसानं मूड बदललाय! – Maharashtra Times

मुंबई: मुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणे आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणे हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो. तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक बोंबा मारणे सुरूच ठेवतात. हेच लोक नागपूर, अहमदाबाद जलमय होते तेव्हा मात्र गप्प असतात,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे. (Shiv Sena in Saamana Editorial)

मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी तुंबले. घरे, रुग्णालयांसह अनेक कार्यालयांत पाणी गेले. त्यावरून विरोधकांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनं ‘सामना’तून त्यास उत्तर दिलं आहे. रेकॉर्डब्रेक पाऊस व मुंबईच्या भौगिलिक स्थानामुळं ही परिस्थिती निर्माण झाली, असा सूर शिवसेनेनं लावला आहे. ‘मुंबई पावसाने जलमय होऊ नये याची काळजी घेतलीच पाहिजे. तशी ती घेतली जातच असते, पण २४ तासांत अडीच दशकातील विक्रमी पाऊस कोसळत असेल तर कसे होणार? मागील काही वर्षांत मुंबईच्या पावसानेही ‘मूड’ बदलला आहे. कधी तो २४ तासांत विक्रमी प्रमाणात पडतो तर कधी महिन्याच्या पावसाची सरासरी दोन-तीन दिवसांत पूर्ण करून मोकळा होतो. याही वर्षी जुलै, ऑगस्ट आणि आता तेच घडले. १९९४ ते २०२० या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता,’ याकडंही शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे.

वाचा: मुंबई दरवर्षी का तुंबते?; मुंबईकरांचा संतप्त सवाल

‘प्रत्येक पावसाळ्यात मुसळधार पावसाने मुंबईचे काही भाग जलमय होतात, त्याचा परिणाम जनजीवनावर, वाहतुकीवर होतो. अशाही परिस्थितीत महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. अशा वेळी त्यांच्याविरुद्ध बोंब मारणे म्हणजे या सर्व यंत्रणांचा अपमान केल्यासारखेच आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा: मंगळवारची रात्र जागवली, बुधवारचा दिवस घराबाहेर! मुंबईकरांचे हाल

‘सव्वा कोटी एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या या महानगरीचे चलनवलन फक्त एकट्या महापालिकेच्या हातात नाही. इतर सरकारी यंत्रणांकडे मुंबईच्या वेगवेगळ्या कामांची जबाबदारी आहे. अशा सर्व यंत्रणांनीदेखील आपापली जबाबदारी सांभाळायला हवी, असं म्हणत शिवसेनेनं रेल्वे व अन्य केंद्रीय यंत्रणांकडेही बोट दाखवलं आहे.

वाचा: खडसे म्हणतात, राष्ट्रवादीकडून ऑफर नाही; पण चर्चा काही थांबेना!

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-rains-shiv-sena-gives-reply-to-opposition-criticising-over-water-logging-in-mumbai/articleshow/78287452.cms