मुंबई बातम्या

म्हाडा मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार | Mhada to build affordable houses – TV9 Marathi

मुंबई : मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ( Mhada to build affordable houses  said Jitendra Awhad)

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

पूर्व उपनगरातील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस गृहनिर्माण मंत्र्यांचा आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेणार आहे.

मुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरं बांधता येतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर/सदनिका उपलब्ध करुन देता येतील. म्हाडाने 30 ते 40 वर्षापूर्वी कन्नमवार नगरसारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलाल नगर यासारख्या 56 वसाहती उभ्या केल्या असल्याचं आव्हाड म्हणाले.

मराठी मातीचा अपमान झाला

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री कंगना रनौतबाबतच्या प्रश्नावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे हे 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं हे माझ्यासारख्या मराठी मातीवर प्रेम करणाऱ्याला आवडणार नाही, असं आव्हाड म्हणाले. टोकाचे मतभेद असू शकतात. रिप्बलिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे मराठी मातीचा अपमान झाल्याचं आव्हाड म्हणाले.

अभिनेत्री कंगणा रनौत आणि अर्णब गोस्वामीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर या दोघांचा निषेध करण्यात आल्याचं आव्हाडांनी सांगितलं.

“मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोणत्याही पक्षाचे असो, त्यांचा एकेरी उल्लेख चुकीचा आहे” असं आव्हाड म्हणाले. वडीलधाऱ्यांना आपण नेहमी आदरपूर्वक बोलतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. उत्तर प्रदेशमध्ये आप शिवाय बोलत नाही. वडीलधाऱ्यांचं सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आहे, असं आव्हाडांनी नमूद केलं.

( Mhada to build affordable houses  said Jitendra Awhad)

संबंधित बातम्या 

“वचन द्या, एकही घर विकायचं नाही”, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत   

SRA योजनेतील फ्लॅटचे नियम गृहनिर्माण मंत्रालय शिथील करणार 

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mhada-to-build-affordable-houses-at-mumbai-thane-announce-housing-minister-jitendra-awhad-267824.html