मुंबई बातम्या

ही तर वादमाफियांची पोटदुखी; ‘मुंबई’वरून शिवसेनेचा विरोधकांवर पुन्हा हल्ला – Maharashtra Times

मुंबई:मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळ्या वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे, अशा शब्दांत शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबईवर टीका करणाऱ्यांवर हल्ला चढवला आहे.

संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मुंबई महाराष्ट्राच्या हाती पडली. याचे भान महाराष्ट्र दुश्मनांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱ्यांनी ठेवलेच पाहिजे, अशी विरोधकांवर टीका करतानाच महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे औरंगाबादेत आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱ्या हातात स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱ्यावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारून पाहावे!, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

Sanjay Raut : आमच्यासाठी कंगना एपिसोड संपला; शिवसेना बॅकफूटवर?

CM ठाकरेंचे कार्टून फॉरवर्ड केले; निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांचा हल्ला

शिवसेनेची टीका आणि टोले

>> कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरू असताना घडलेले दिसत होते. शिवसेनाप्रमुख नेहमीच जाहीरपणे सांगत, देश एक आहे, अखंड आहे. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई-महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही? जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला? आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये.

>> डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान! डॉ. आंबेडकरांचा अवमान झाला तरी चालेल, पण महाराष्ट्र द्वेष्ट्या मंडळींबरोबर खुर्ची उबवायला मिळाली म्हणजे झाले. असे नग जेव्हा आपल्यातच निपजतात तेव्हा १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या विकृत शक्तींना आयतेच बळ मिळत राहते.

>> संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात जसे अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेखांसारखे शूर होते तसे काही अस्तनीतील निखारेही होतेच. म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळायची राहिली काय? लढ्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मुंबई महाराष्ट्राच्या हाती पडली. याचे भान महाराष्ट्र दुश्मनांच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱ्यांनी ठेवलेच पाहिजे.

>> दादासाहेब फाळक्यांना कधी ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले नाही. पण फाळक्यांनी उभारलेल्या मायानगरीतील अनेकांना ‘भारतरत्न’च काय तर ‘निशाने पाकिस्तान’पर्यंतचे किताब मिळाले. मुंबईत कोणीही यावे आणि आपल्या हरहुन्नरीपणावर नशीब अजमावावे. मुंबईचा फिल्मी उद्योग आज लाखोंना रोजीरोटी देत आहे. सध्या येथे ‘खानावळ’ आहे अशी टीका होते. तशी कधी मराठी, तर कधी पंजाबी मंडळींची चलती
होतीच. पण मधुबाला, मीनाकुमारी, दिलीप कुमार, संजय खानसारख्या दिग्गज मुसलमान कलावंतांनी पडद्यावरील आपली नावे ‘हिंदू’ केली. कारण तेव्हा येथे धर्म शिरला नव्हता, तर कला-अभिनयाचेच नाणे खणखणीतपणे वाजवले जात होते.

>> घराणी संगीतात आहेत. दिग्दर्शनातसुद्धा आहेत. पण यापैकी प्रत्येकाने मुंबईलाच आपली कर्मभूमी मानली. नव्हे, मुंबईच्या जडणघडणीत योगदान दिले. पाण्यात राहून माशाशी वैर केले नाही किंवा स्वतः काचेच्या घरात राहून दुसऱ्यांच्या घरावर दगड मारले नाहीत. ज्यांनी ते मारले ते मुंबई-महाराष्ट्राच्या शापाचे धनी ठरले. मुंबईला कमी लेखणे म्हणजे स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणणे असा हा प्रकार आहे.

एकनाथ खडसेंची टीका; अमृता फडणवीस यांनी दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-slams-against-opponents-over-mumbai-issue/articleshow/78070689.cms