मुंबई बातम्या

वादळ दिशाबदलाची शक्यता नाही, तासाभरात चक्रीवादळ ठाणे-मुंबईच्या दिशेने : हवामान विभाग – TV9 Marathi

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरचा धोका टळला आहे. हे वादळ पुण्याच्या पश्चिमेच्या दिशेने (Mumbai Cyclone Alert) पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अलिबागमध्ये चक्रीवादळाने लँड फॉल केल्यानंतर तासाभरात मुंबईत चक्रीवादळ दाखल होईल, असं बोललं जातं होतं.  मात्र “चक्रीवादळाची दिशा बदलल्याने सद्यस्थितीत मुंबईत चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ  श्रीनिवास औंदकर यांनी दिली.”

“चक्रीवादळ मुंबईला पोहोचण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या वाऱ्याची दिशा पाहता मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल.  मात्र चक्रीवादळ मुंबईपर्यंत पोहोचणार नाही, वादळ पेणकडून ठाण्याकडे पुढे सरकेल,” अशी माहिती हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंदकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

यापूर्वी मुंबईच्या कुलाबा वेधशाळेचे प्रादेशिक विभाग महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी निसर्ग चक्रीवादळ पुढच्या एक तासात मुंबई आणि ठाण्यात धडकण्याची शक्यता  वर्तवली होती. या चक्रीवादळाची दिशा बदलण्याची शक्यता कमी आहे. चक्रीवादळ जेव्हा मुंबई-ठाण्यातून जाईल. तेव्हा जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किमी इतका असेल, असेही ते म्हणाले होते. मात्र सुदैवाने मुंबईवरचा चक्रीवादळाचा धोका टळला आहे.

कृष्णानंद होसाळीकर नेमकं काय म्हणाले?

“निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि रायगडपासून वरती सरकरणार आहे. चक्रीवादळ काही वेळातच रायगड, मुंबई आणि ठाण्यात धडकेल. त्यावेळी वाऱ्याचा वेग हा जवळपास ताशी 100 ते 125 किमी इतका अशी असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तितक्या गतीने वारे वाहत असल्याची नोंद देखील झाली आहे. बऱ्याच ठिकाणी किनारपट्टी भागात मुसळधार पाऊसही सुरु आहे. वारे जोरदार वाहत आहेत. त्यामुळे नुकसानही होत आहे.

चक्रीवादळाची सध्या दिशा बदलण्याची शक्यता कमी आहे. चक्रीवादळ ज्या मार्गाने जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याच मार्गाने ते जात आहे. लँडफॉल पूर्ण व्हायला दोन ते तीन तास जातील. दुपारी साडेबारा वाजता लँडफॉल व्हायला सुरुवात झाली आहे. या दरम्यान वारे जोरदार वाहतील. याशिवाय पाऊसही मुसळधार पडण्याची शक्यता आहे. बरेच ठिकाणी अंदाज वर्तवल्यानुसार चित्र दिसत आहे.

चक्रीवादळाचा जो केंद्रबिंदू आहे तो रायगडमधून उत्तरेकडे जायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढच्या एक तासात चक्रीवादळाचा केंद्रबिंदू मुंबई आणि ठाणे परिसरात धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ समुद्रातून जमिनीवर येतं, तेव्हा त्याचा वेग वाढण्याची शक्यता फारच दुर्मिळ असते. मुंबईत जेव्हा चक्रीवादळ पोहोचेल तेव्हा वारे 100 ते 120 किमी प्रतीतासच्या वेगाने धावण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 75 किमी अशी नोंद झाली आहे. हा वेग अजून काही वेळ राहण्याची शक्यता आहे.

वादळी वाऱ्यांमुळे झाडे, कच्ची घरे, झोपडपट्टी परिसरात हानी पोहोचण्याची शक्यता आहे. घरावरचे पत्रे उडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जवळपास चार ते सहा तास मुंबई आणि ठाण्यात राहील. या चक्रीवादळाचा परीघ 400 ते 500 किमी आहे. अशावेळी पुणे, नाशिक, पालघर याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळ जसं पुढे जाईल तशी त्याची तीव्रता कमी होईल. रात्री मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल,” असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेचे प्रादेशिक विभाग महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला (Mumbai Cyclone Alert) होता.

संबंधित बातम्या : 

Nisarga Cyclone : मुंबई शहराचे पालकमंत्री मध्यरात्रीही अ‍ॅक्शन मोडमध्ये, मढ-भाटीत मच्छिमारांची भेट

पुढच्या अडीच तासात ठाणे आणि मुंबईत चक्रीवादळ धडकणार, हवामान विभागाची माहिती

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-cyclone-alert-cyclone-nisarga-will-make-a-landfall-in-mumbai-and-thane-soon-said-meteorological-department-227024.html