कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत असलेल्या मुंबईतील आरोग्य यंत्रणेला आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. सध्या मुंबईतील कोरोना उपचारात एका औषधाची मात्रा चांगलीच लागू पडत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना टोसीलुझूमॅब हे औषध दिले जात आहे. या औषधामुळे अनेक रग्णालयांतील गंभीर रुग्णांची परिस्थिती सुधारत असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत ४० रूग्णांना हे औषध दिले असता यापैकी ३० रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यापैकी १४ जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
‘मुंबईची लोकसंख्या प्रचंड; डोअर टू डोअर स्क्रीनिंग अशक्य’
इंजेक्शन टोसीलुझूमॅब हे औषध प्रामुख्याने संधिवातसारख्या असाध्य आजारांवर दिले जाते. या औषधामुळे रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा तर झालीच याशिवाय त्यांना व्हेंटीलेटरची गरजही भासत नसल्याचे दिसून येत आहे. जगभरातील विविध वैद्यकीय तज्ञ आणि रूग्णालयांच्या अनुभवाच्या आधारे याचा वापर करण्यात आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यामुळे मुंबईत मृत्यूदराचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी आशा पालिकेला आहे.
आतातरी लॉकडाऊन संपणार का; वाचा मोदी काय म्हणाले?
धारावी झोपडपट्टी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. याठिकाणी मंगळवारी कोरोनाचे ४६ नवे रुग्ण आढळून आले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आतापर्यंत धारावीत कोरोनाचे ९६२ रुग्ण आढळून आले असून यापैकी ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-coronavirus-this-medicine-showing-effect-on-serious-patients/519924