मुंबई बातम्या

मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासनासह ८ जणांवर फौजदारी खटला – Maharashtra Times

हिमालय पूल दुर्घटनेतील मृताचे नातेवाईक अखेर न्यायालयात

वर्ष उलटले तरी मदत नाहीच

संबधित अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी ही मागणी

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील गेल्या वर्षी हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत रंजना तांबे, अपूर्वा प्रभू आणि भक्ती शिंदे या पारिचारिकांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेला वर्ष उलटले तरी पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेकडून या मृतांच्या तसेच कायमस्वरूपी अपंग झालेल्या जखमीच्या नातेवाईकांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळालेली नाही. उलट आपल्याकडे पुनर्वसनाचे धोरण नसल्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात देत महापालिकेकडून जबाबदारी झटकण्यात आली आहे. यामुळेच देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत नागरिकांच्या जीवावर उठणाऱ्या मुंबई महापालिकेबरोबरच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात रंजना तांबे यांचे बंधू धर्मेश तांबे यांनी फौजदारी खटला दाखल केला आहे. या दुर्घटनेत निधन झालेल्या भक्ती शिंदे आणि अपूर्वा प्रभू यांचे नातेवाईकही पुढील आठवड्यात अशाप्रकारचा खटला दाखल करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील हिमालय पूल १५ मार्च, २०१९मध्ये कोसळला होता. या दुर्घटनेत निधन झालेल्या तिन्ही पारिचारीकांच्या नातेवाईकांना तत्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. दरम्यान या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या परिचारिका रंजना तांबे यांचे बंधू धर्मेश तांबे यांनी या प्रकरणातील किती जणांना या पुलाची जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेकडून नुकसानभरपाई देण्यात आली आहे, याबाबतची माहिती मागविली होती. तांबे याच्या माहिती अर्जाला उत्तर देताना मदतीचे आपल्याकडे धोरण नसल्याचे सांगत मुंबई महापालिकेने हात झटकले होते.

तांबे यांनी माहितीच्या अधिकारात, व्हिजिलन्स अहवालात या पुलासाठी नेमलेल्या ऑडिटरने केलेल्या तपासणीनंतर पालिकेच्या इंजिनीअरकडून त्याची खातरजमा न करताच या पुलाच्या पूर्णत्वाचा आणि वापरायोग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यावरून महापालिकेच्या इंजिनीअरने निष्काळजीपणा दाखविल्याचे स्पष्ट झाल्याचे तांबे यांचे म्हणणे आहे. या पुलावरून दररोज नागरिक ये-जा करणार असल्यामुळे त्यादृष्टीने महापालिकेने योग्य ती तपासणी करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तशाप्रकारची तपासणी न केल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळेच महापालिकेने संबंधितांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी मागणी करत तांबे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. तरीही महापालिका प्रशासनाकडून या घटनेबाबत अद्यापि कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सहा महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेने यासारख्या दुर्घटनेतील बळींना आर्थिक मदत देण्यासाठी समिती स्थापन करून धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्याचीही अद्यापि अंमलबजावणी झालेली नसल्याचे तांबे यांनी सांगितले.

‘अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी’

या दुर्घटनेत आपण आपली बहीण गमावली आहे. त्या बदल्यात कितीही पैसे मिळाले तरी माझी बहीण परत येणार नाही, मात्र या अपघाताला कारणीभूत असणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांना शिक्षा व्हावी, या उद्देशानेच आपण मुंबई महापालिकेविरोधात फौजदारी खटला दाखल केल्याचे धर्मेश तांबे यांनी ‘मटा’ला सांगितले. तांबे यांच्यापाठोपाठ प्रभू आणि शिंदे देखील आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्यापासून हिरावण्यास कारणीभूत असणार्या पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहेत.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporation-railway-administration-along-with-3-others/articleshow/74641407.cms