मुंबई बातम्या

#Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यातील काही CBSE, ICSC शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय – ABP Majha

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्या काही शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याची पालक संघटनांची मागणी आहे.

मुंबई : राज्यात एकूण 14 आणि शहरामध्ये कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्यानंतर राज्य सरकारने शाळांच्या बाबतीत अद्याप काही निर्णय घेतला नसला तरी काही खाजगी आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांनी मात्र काही दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शाळांनी या दरम्यान पालकांनी विद्यार्थ्यांना गरज नसल्यास शाळेत नाही पाठविले तरी त्यांच्या श्रेयांक पद्धतीवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे सांगत दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे देशांतील इतर राज्यांतील शाळांना कोरोनाच्या भीतीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेत असतील तर राज्य सरकार काय करत आहे? असा सवाल पालक संघटना आणि शिक्षक उपस्थित करत आहेत.

ठाण्यातील आर्किड शाळेने परिपत्रक काढून पालकांना गरज नसल्यास पाल्याला आणू नये असा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्याला सर्दी, खोकला असेल किंवा विद्यार्थी कोरोना इन्फेक्टेड भागात राहत असेल तर त्याला अजिबात शाळेत घेऊन येऊ नये असा या परिपत्रकात सांगितलं असून 31 मार्चपर्यंत शाळा आम्ही सुरू ठेवणार असल्याच त्यांनी सांगितले आहे. नर्सरी ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी शाळेत किंवा परीक्षेला नाही आलं तरी आतापर्यंतच्या सरासरी गुणांनुसार गुणपत्रक दिले जाईल अशी माहिती परिपत्रकात दिली आहे. मुळातच तापमानातील सातत्याच्या चढ-उतारांमुळे सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्याच्या तक्रारी सुरू आहेत. रुस्तमजी इंटरनॅशनल, धीरूभाई अंबानी, ठाण्यातील वसंत विहार, जुहू येथील उत्पल संघवी,  फोर्ट परिसरातील कॅथड्रल अशा शाळांनाही सुट्टी दिल्याची माहिती काही पालकांनी दिली आहे.

 288 आमदारांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न केला, याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, विद्यार्थी महत्त्वाचे नाहीत का? असा सवाल हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे उदय नरे यांनी उपस्थित केला आहे. तर राज्यातील कोरोना संदर्भातील परिस्थिती पाहता राज्यातील शाळा, महाविद्यालये काही दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनकडून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/coronavirus-decision-to-give-holiday-to-some-schools-in-mumbai-thane-749931